कुमार गंधर्व यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध गायिका वसुंधरा कोमकली यांनी स्वतःकडून राहून गेलेल्या गोष्टींना उजाळा दिला. वसुंधराजी माहेरच्या श्रीखंडे. त्या कलकत्त्यात जन्मल्या. त्यावेळेचं कलकत्ता म्हणजे एकदम सांस्कृतिक शहर, तसंच ते भारतीय संगीताचं मोठं केंद्र होतं. त्यांच्या घरातही सांस्कृतिक बहार होती. वसुंधराजींचं सुरुवातीचं गाणं कलकत्त्यातच आकाराला आलं आणि त्यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी कलकत्त्याच्या ‘ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स’सारख्या मानाच्या संगीतसभेत कुमारगटात गाऊन पहिला पुरस्कार म्हणून चांदीची छोटी तंबोरी मिळवली. या गाण्यामुळे त्या लहान वयातंच रेडिओ आर्टिस्टही बनल्या जिथे प्रसिद्ध तबलावादक अल्लारखाँ साहेब यांची साथ त्यांना लाभली.
त्यानंतर कलकत्त्याच्या सभेत कुमार गंधर्वांचं गाणं झालं. वसुंधराजींना त्यांचं गाणं खूप आवडायचं, तसंच त्यांच्याकडून वसुंधराजींना गा णं शिकायचंही होतं. १९४२ च्या महायुद्धाचा परिणाम आणि गाणं शिकण्यासाठी कुमार गंधर्वांची अट या दोन्ही गोष्टींमुळे वसुंधराजींचे कुटुंब मुंबईत आले व देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिकमध्ये त्यांचं संगीतशिक्षण सुरु झालं. स्वतःचं संगीतशिक्षण सुरु असतानाच वसुंधराजींनी शिवाजी पार्कला संगीत क्लास सुरु केला व एका शाळेत त्यांनी संगीत शिक्षिका म्हणूनही काम केले. पु. ल. देशपांडे यांच्या ‘भाग्यवान’ नाटकासाठी नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांनी त्यांना विचारलं तेव्हा वसुंधराजींनी त्यात काम केलं जे नावाजलंही गेलं. त्यानंतर चिंतामणरावांनी बसवलेल्या स्वा तंत्र्यवीर सावरकरांच्या ‘सन्यस्त खड्ग ‘ नाटकाच्या अंकातही त्यांची मुख्य भूमिका होती.
वसुंधराजींसाठी रंगभूमीचं एक अनोखं दालन उघडलं गेलं असताना, तसंच नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांसारखा माणूस त्यांच्या पाठीशी उभा असताना त्या तिथे स्वतःच्या हक्काची स्वतंत्र जागा नक्कीच निर्माण करू शकल्या असत्या पण कदाचित त्यांच्या आईला तेव्हा नाटकात काम केलेलं फार आवडायचं नाही म्हणून किंवा वसुंधराजींच्या संगीताच्या वेडाने या नाट्यवेडावर मात केली आणि त्यांच्या हातून नाटक कायमचं निसटलं.
कुमारजींच्या पत्नी भानुताई यांचं १९६१ मध्ये निधन झाल्यावर वसुंधराजींनी १९६२ मध्ये कुमारजींशी विवाह केला आणि त्या मध्यप्रदेशात देवासला गेल्या. संगीताचा तळपता सूर्य घरात असल्याने वास्तविक त्यांचं गाणं वाढायला हवं होतं, स्वतंत्रपणे काही करायची संधी त्यांना मिळायला हवी होती पण घर सांभाळताना त्या स्वतःचं गाणं हरवून बसल्या. त्यामुळे जरी लोक त्यांना ज्येष्ठ गायिका म्हणून ओळखतात,त्यांनी गेल्या पंधरा वीस वर्षात स्वतंत्रपणे अनेक मैफलीही केल्या तरी ऐन उमेदीच्या काळात मात्र गाणं त्यांच्या हातून निसटलं.
देवासमध्ये शाळेत शिकवायला जाताना वसुंधराजी जेव्हा पहिल्यांदा सायकलवर जायला लागल्या तेव्हा त्या पडल्या आणि परत कधीही त्यांनी सायकलचं नाव काढलं नाही. त्यामुळे आता वयाच्या ८१व्या वर्षीही त्यांना रुखरुख लागते की सायकल न शिकल्यामुळे त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. तसंच मनात आलं की पाहिजे तिथे सायकलवरून जाता येत नाही.
अशाप्रकारे वसुंधराजींच्या मते ‘ कलकत्त्यापासून देवासपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या हातून रंगभूमी, स्वतःचं ऐन उमेदीतील गाणं आणि सायकल या गोष्टी अलगद निसटून गेल्या ज्या जपणं त्यांच्या स्वतःच्याच हातात होतं. आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर काही ना काही निसटतं आणि हे अंतिम सत्य स्वीकारावंच लागतं पण तरीही कधीतरी एकांतक्षणी ती रुखरुख उचंबळून येते.’
No comments:
Post a Comment