Saturday, April 28, 2012

‘देऊळ’च्या यशानंतर ‘देविशा’ फिल्म्सचा आगामी सिनेमा ‘भारतीय’

‘देविशा फिल्म्स’ने ‘देऊळ’ चित्रपटाची निर्मिती करून पदार्पणातच सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी दिले जाणारे सुवर्णकमळ, तीन राष्ट्रीय पुरस्कार, आणि मराठी सिनेमाला अनेक वर्षांनी शंभर दिवस पूर्ण करण्याचे भाग्य दिले. नुकतीच वरळीच्या मेफेअर हॉटेलमध्ये ‘देविशा फिल्म्स’ने आपल्या आगामी ‘भारतीय’ या चित्रपटाची घोषणा केली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप, दिग्दर्शक गिरीश मोहिते, कथालेखक अनिरुद्ध पोतदार, संवाद लेखक संजय पवार, संगीतकार अजय-अतुल, गीतकार गुरु ठाकूर आणि संदीप खरे, सुलेखनकार अच्युत पालव तसेच या चित्रपटातील कलाकार सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, मिता सावरकर, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, कुलदीप पवार, ऋषिकेश जोशी उपस्थित होते.
निर्माते अभिजित घोलप यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर ‘भारतीय’ विषयी माहिती देताना ते म्हणाले, ” २०१०मध्ये स्थापन झालेल्या ‘देविशा फिल्म्स’च्या माध्यमातून करमणूकप्रधान पण सामाजिक भान ठेऊन केलेले चित्रपट निर्माण होतील याची मी खात्री देतो. ‘देऊळ’ह्या आमच्या पहिल्याच चित्रपट निर्मितीला जगभरातून लक्षणीय प्रतिसाद मिळाला. माझा पुढचा चित्रपट त्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल असाच विषय आणि टीम आम्ही घेतली आहे. ह्या चित्रपटाचा विषय देखील राष्ट्रीय स्वरूपाचा आहे जो आम्ही मराठी ह्या भाषेत करत आहोत. “मी शिवाजीराजे” फेम संजय पवार यांचे संवाद प्रत्येकाला अंतर्मुख करतील. नटरंग नंतर अजय-अतुल यांचे मराठी चित्रपटात पुनर्पदार्पण होत असून सुबोध, मकरंद, जितेंद्र, ऋषिकेश, मिता यांच्याबरोबरच कुलदीप पवार आणि डॉ. आगाशे महत्वाच्या भूमिकेत दिसतील. चित्रपट बघताना खदाखदा हसणारे प्रेक्षक घरी गेल्यानंतर अंतर्मुख होतील हे नक्की. करमणुकीबरोबरच समाजप्रबोधन होईल असा हा मोठा चित्रपट आम्ही १०ऑगस्टला प्रदर्शित करू.”
यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते ‘भारतीय’ चित्रपटाबद्दल आपले विचार मांडताना म्हणाले, “या फिल्मचा कॅनवास खूप मोठा आहे. ही लोकल ते ग्लोबल असा प्रवास करणारी गोष्ट आहे. अनेक लेयर्स,अनेक घटना, तिरकस विनोद हे सगळा मांडताना त्यात एक खूप मोठा चालेंज असणार आहे. हा एक संपूर्ण भारतीय सिनेमा असणार आहे. ‘देविशा’ फिल्म्स बद्दल सांगायचं तर निर्माता तोच परफेक्ट असतो ज्याला उत्तम फिल्म बनवण्याबरोबर पूरक मार्केटिंगही करता येतं आणि हे सगळं अभिजीतना चांगलं जमलंय, म्हणूनच ही फिल्म आणि ही निर्मितीसंस्था माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत.”
‘भारतीय’विषयी बोलताना या चित्रपटाचे संवाद लेखक संजय पवार म्हणाले, “मी जेव्हा अनिरुद्धची ही कथा ऐकली तेव्हा इंस्टंटली मला या प्रोजेक्टवर काम करावंसं वाटलं. आपल्या भारतीय असण्याची जी मजा आहे ती मांडताना मला खूप मजा येतेय.”
‘भारतीय’द्वारे अजय-अतुल तब्बल तीन वर्षांनी पुन्हा मराठी संगीत रसिकांना भेट देणार आहेत. मराठीत परत काम करण्यासाठी त्यांनी खास भारतीय याच चित्रपटाची निवड केली. याविषयी बोलताना अतुल म्हणाले, “परत एकदा मराठीत येण्यासाठी एखाद्या चांगल्या स्क्रिप्टची आम्ही वाट बघत होतो. या चित्रपटाची कथाच फार छान आहे, शिवाय यात आम्हालाही काहीतरी वेगळं करण्याचा आनंद आहे. ‘देविशा’फिल्म्ससाठी खरंतर ‘देऊळ’च्याच वेळेस आम्हाला काम करायचं होतं पण हिंदीतल्या आमच्या कमिटमेंटमुळे ते आम्ही करू शकलो नाही पण आता जेव्हा अभिजीतने आम्हाला या प्रोजेक्टबद्दल सांगितले तेव्हा हे आपण करायचंच असं आम्ही ठरवलं.”
यानंतर अत्यंत अभिनव पद्धतीने ‘the new common-man’ या ‘mascot’चे अनावरण करून या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली. हा नवीन ‘भारतीय’ आजच्या काळातील सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप यांनी जाहीर केले.
नंतर अभिनेता सुबोध भावे याने ‘भारतीय’विषयी त्याचे विचार मांडले, ” मुळात मला या चित्रपटाची कथाच खूप आवडली आणि त्याबरोबरच गिरीश सोबत चित्रपट करायला मिळणार होता कारण गिरीश हा माझा लाडका दिग्दर्शक आहे. त्याच्या सोबत इतर खूप कामं केली असली तरी चित्रपट करायला मिळण्याची ही पहिलीच संधी आहे. पहिलीच निर्मिती असलेल्या ‘देऊळ’ला जे यश अभिजित घोलप यांनी मिळवून दिलंय त्यामुळे अभिजित सोबत काम करण्याची एक छान संधी मला मिळाली. आणखी आम्ही एकाच शाळेचे विद्यार्थी असल्यामुळे ते कनेक्शनही होतंच. भारतीय असण्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान असतो तसा मलाही आहे. इतकाच काय पुढच्या जन्मी आणि त्याच्या पुढच्या जन्मीही परत परत भारतीय म्हणूनच जन्माला यायला मला आवडेल.”
मकरंद अनासपुरे ‘भारतीय’बद्दल मत मांडताना म्हणाले, “संजयचं लिखाण आणि गिरीशचं दिग्दर्शन या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे मला हा चित्रपट करावासा वाटलं. ‘टिकल ते पोलिटिकल’ करत असताना मी संजय सोबत बरंच काम केलंय. शिवाय गिरीश सोबत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ करतानाही फार मजा आली होती. त्यामुळे या दोघांचा मिळून असणारा चित्रपट भन्नाट असणारच या विषयी शंका नव्हती. सोबतच ‘देऊळ’च्या यशानंतर अभिजीत घोलप यांचा हा दुसरा सिनेमा आहे. ते या चित्रपटाचे निर्माते असल्याने या चित्रपटाच्या यशाबद्दलही मला खात्रीच आहे. ‘भारतीय’ ही एक युनिव्हर्सल संकल्पना आहे आणि ती युनिव्हर्सल आणि युनिक असणंच खूप महत्त्वाचं आहे. तिला तुकड्या तुकड्यात विभागून चालणारच नाहीये.”
यानंतर ‘भारतीय’ बद्दल सांगताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले, “एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट असूनही तो वेगळा नाहीये. आज चित्रपटाची घोषणा करत असतानाच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित केली जातेय, मराठी सिनेमासाठी ही एक नवीन बाब आहे. जुन्या पिढीतला असल्याने या गोष्टीचं माझ्यावर नाही म्हणलं तरी थोडं दडपण आहेच पण अभिजीत घोलप हे या चित्रपटाचे निर्माते असल्याने मी आश्वस्तही आहे, आतापर्यंत ते जे बोलतात ते करूनही दाखवतात असाच अनुभव आहे.”
जितेंद्र जोशी या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले, “या चित्रपटासाठी जेव्हा मला विचारण्यात आले तेव्हा मला संजय कडून एक मेसेज मिळाला, तो असा होता ‘मित्रा जे चाललंय आणि घडतंय त्याला उत्तर देण्याची धमक असेल तर या चित्रपटाचा तू नक्की विचार कर’ आणि मी हा चित्रपट करायचाच असं ठरवलं.”
‘भारतीय’मधील आपल्या भूमिकेविषयी बोलताना मिता म्हणाली, ” या चित्रपटातून गावातल्या मिलीची भूमिका मी करणार आहे आणि असं असलं तरीही नेहमीच्या गाव की गोरी भूमिकेपेक्षा ही वेगळी असणार आहे इतकंच मी आत्ता सांगणार आहे.”
या चित्रपटाची कथा ज्यांना सुचली ते अनिरुद्ध पोतदार नंतर म्हणाले, “साधारणतः तीन वर्षांपूर्वी मला ही कथा सुचली. एक भारतीय म्हणून जगताना मी स्वतः भारतीय असण्याचे अनेक कंगोरे अनुभवलेत. रस्त्यातील खड्ड्यातून जाताना मी वेगळा भारतीय असतो, सचिन तेंडूलकर सेन्चुरी मारतो तेव्हा मी एक वेगळाच भारतीय असतो. असे भारतीयपणाचे वेगवेगळे पैलू यात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. गिरीश सारखा दिग्दर्शक आणि अभिजीत घोलप यांसारखा एक जाणकार निर्माता माझ्या कथेला एका उंचीवर नेतील याबद्दल मला खात्रीच आहे.”
या चित्रपटाचे प्रसिद्धीकार आणि या वर्षीच्या राज्य पुरस्कारात ‘देऊळ’साठीच उत्कृष्ट जाहिरातीचा पुरस्कार प्राप्त करणारे प्रसिद्ध सुलेखनकार अच्च्युत पालव यांनी ‘भारतीय’ या त्यांच्या संकल्पनेविषयी माहिती देताना सांगितले, “आजच्या युवकांच्या सैरभैर आणि गोंधळलेल्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय, हिंदुस्थानी, इंडियन अशी अनेक नावं असणारा तरीही भारतीय असणारा, आजूबाजूच्या परिस्थितीने भरकटून गेलेला आणि चौफेर घडणाऱ्या घटनांची जाणीव असावी लागते याची जाणीव झालेला असं हा mascot ‘भारतीय’ या चित्रपटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी साकारला गेला आहे. ‘देविशा फिल्म्स’बरोबर ‘देऊळ’ हा माझा पहिला चित्रपट. काम करताना खूप आनंद वाटला. ‘देऊळ’सारखा एक वेगळा विषय, चांगला दिग्दर्शक आणि निर्मात्याने माझ्यासारख्या कलाकाराला जाहिरात करण्यासाठी दिलेलं स्वातंत्र्य यामुळे काम करायला खूप मजा आली ज्यामुळे यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जाहिरातीचा पुरस्कार मला मिळाला.”
याप्रसंगी उपस्थित पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी चित्रपटाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांकडून चित्रपटाविषयी अधिक माहिती मिळवली.
आपलं ‘भारतीय’ असणं म्हणजे नेमकं काय याचा शोध घेण्याचा एक मार्मिक प्रयत्न म्हणजे ‘देविशा’ फिल्म्सचा नवीन चित्रपट ‘भारतीय.’ मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्याच्या आपल्या शब्दांवर परत एकदा खरे उतरण्यासाठी ‘देविशा फिल्म्स’, ‘भारतीय’ या चित्रपटासोबत सज्ज झाली आहे. मराठी रसिकांसाठी ‘देविशा फिल्म्स’चा आगामी चित्रपट ‘भारतीय’ हा विचार आणि मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.

No comments:

Post a Comment