Tuesday, April 24, 2012

‘खेळ मांडला’

‘अमृता प्रॉडक्शन्स’ निर्मित आणि ‘मिराह एन्टरटेनमेंट’ प्रस्तुत ‘खेळ मांडला’ या चित्रपटात नियतीच्या लपंडावाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपलं आयुष्य एक रंगमंच असून आपण रंगमंचावरील कलाकार आहोत कारण प्रत्येकालाच आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागतात. कधी पदरी सुख पडते तर कधी निराशा. या सगळ्याचेच धागे नियतीच्या हातात असतात. हीच नियती जेव्हा कठोरपणे आपल्या नात्यांवर घाव घालते तेव्हा त्यातून निर्माण होणारे दुःख वेदनादायक असते. नियतीच्या या कठोर खेळाची गोष्ट आपल्याला ‘खेळ मांडला’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून बाप लेकीच्या भावस्पर्शी नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या दासूची आणि त्याच्या मुलीची आहे. बाहुल्यांच्या जगात वावरणाऱ्या आणि निर्जीव बाहुल्यांनाही आपल्या कलेने जिवंत करणाऱ्या दासूने आपल्या मुलीचं नावही बाहुली ठेवलं आहे. तिला आपल्या वडिलांचे मायेचे शब्द ऐकता येत नाहीत की त्यांच्या डोळ्यातील प्रेमही टिपता येत नाही कारण दासूची ही बाहुली जिवंत असली तरी ती जन्मजात मूक-बधीर आणि आंधळी आहे. तिला फक्त स्पर्शाची भाषा कळते. दासू तिच्यावर जीवापाड प्रेम करत तिला एखाद्या बाहुलीप्रमाणे जपतो. बाहुलीच त्याच्या जगण्याचा उद्देश आहे. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करत तो आपल्या लाडक्या बहुलीलाही या खेळत सामील करून घेतो आणि आपल्या हातातील दोऱ्यांच्या साहाय्याने तिला एक नवीन भाषा समजावून सांगतो. या दोरीनेच बांधल्या गेलेल्या मायेच्या या नात्यावर नियतीची वाईट दृष्टी पडते आणि तिच्या विचित्र खेळामध्ये दासूच्या आयुष्याची घडी विस्कटून जाते. मंगेश देसाई, प्रसाद ओक, मानसी साळवी, उदय सबनीस, उर्मिला कानेटकर, संतोष जुवेकर आणि अनन्या या कलाकारांच्या ‘खेळ मांडला’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
चित्रपटात एकून तीन गाणी असून ती चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘चांदन्याच्या रथामंदी’ हे गीत प्रा. अशोक बागवे यांनी लिहिलं असून ते चिनार खारकर यांनी गायले आहे तर ‘कौन संग बांधे डोर’ या अभिजीत पानसेंच्या गीताला नंदेश उमप यांनी स्वरबद्ध केलं आहे. विजू माने यांनी या कथेचं सार मांडणारं ‘खेळ मांडला’ हे अर्थपूर्ण गीत लिहिलं असून अवधूत गुप्ते यांनी ते स्वरबद्ध केलं आहे. अतिशय संवेदनशील आणि भावस्पर्शी कथानक असलेल्या या चित्रपटाचे संगीतही कथेला साजेसंच आहे.
चित्रपटात दासूची मध्यवर्ती भूमिका मंगेश देसाई या गुणी अभिनेत्याने साकारली असून या चित्रपटाच्या निमित्ताने तो प्रथमच एका गंभीर भूमिकेत दिसणार आहे. दासूच्या मूक-बधीर, अंध मुलीची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे अनन्या या छोट्या मुलीने. चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी यापूर्वी ती ‘रात्र’, ‘शर्यत’ सारखे वेगळे चित्रपट दिले आहेत. ‘खेळ मांडला’ या चित्रपटाद्वारेही अतिशय वेगळा विषय मांडण्याचं धाडस त्यांनी केलं आहे.
‘मुंबई पुणे मुंबई’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘फक्त लढ म्हणा’ असे एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या ‘मिराह एन्टरटेनमेंट’च्या ‘खेळ मांडला’ या नवीन कलाकृतीने विविध चित्रपट महोत्सवात प्रेक्षक-परीक्षकांची वाहवा मिळवली आहे. हा चित्रपट येत्या २७ एप्रिलला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

No comments:

Post a Comment