Tuesday, August 21, 2012

‘Conflict and Custody’ : राणी धवन शंकरदास यांनी अनुभवलेली तिची पल्याडची कथा

आज सर्वत्रच गर्भात होणा-या स्त्रीच्या हत्येला सगळ्याच स्तरावरून विरोध होत आहे. प्रत्येक संघटना, संस्था, डॉक्टर, स्त्रीच्या या जन्मापूर्वीच होणा-या निर्घूण छळाच्या विरुद्ध आवाज उठवत आहेत. पण कित्येक काळापासून स्त्रीच्या जन्मानंतर तिला होणा-या यातना आणि त्या यातनांना कवेत घेऊन ती कंठत असलेले तिचं जीवन या परिस्थितीत मात्र अजूनही पूर्णपणे फरक पडलेला दिसत नाही. समाजात वावरणारी स्त्रीसुद्धा तिची सुरक्षितता, तिचे अधिकार, तिचा मान या सर्वांवर कुठे विरजण तर पडणार नाही ना या भीतीने ग्रासलेली दिसते, तर मग समाजाच्या एका लहान पण भयानक अशा अंधा-या कोठडीत आयुष्य घालवणा-या अगतिकेची काय कथा?
याच अगतिक स्त्रियांच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न ‘प्रजा’ (पीनल रिफॉर्म अँड जस्टीस असोसिएशन) या संस्थेने केला असून राणी धवन शंकरदास यांनी ‘ Conflict and Custody’ या पुस्तकातून त्यांची हाक ऐकली आहे. तुरुंगांच्या चार दगडी भिंतींमधल्या गुदमरलेल्या विश्वात आयुष्य ढकलणा-या या स्त्रिया, त्या कोंदट वातावरणात ज्यांचे श्वासही कोंडले जात आहेत अशा स्त्रियांच्या आयुष्याची कथा या पुस्तकात मांडली गेली आहे. राणी धवन शंकरदास या पीनल रिफॉर्म अँड जस्टीस असोसिएशन या संस्थेच्या जनरल सेक्रेटरी आणि पीनल इंटरनॅशनल रिफॉर्म च्या ऑनररी प्रेसिडेंट आहेत. देशभरातील तुरुंगांमध्ये हिंडून आणि तिथल्या महिला कैद्यांशी समुपदेशनाच्या निमित्ताने चर्चा करून त्यातून आलेल्या अनुभवातून हे पुस्तक साकार झालं आहे. वेगळ्या वाटेने जाऊ इच्छिणा-या समुपदेशकांनी या सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक कारणांनी गांजलेल्या महिलांना मानसिक आधार देऊन शास्त्रीय पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करण्यास पुढाकार घ्यावा हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.
तुरुंगातलं आयुष्य स्तब्ध करणार हे वातावरण मानसिक आरोग्यासाठी अतिशय घातक असून ज्या महिला ६ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्या आहेत, त्यापैकी ५० % स्त्रियांना कोणता न कोणता मानसिक आजार असल्याचं या पुस्तकाद्वारे लक्षात आलं आहे. मानसिक आरोग्य हेसुद्धा माणसाच्या सुदृढ आयुष्याचं द्योतक आहे ही गोष्ट आता कुठेतरी स्थान मिळवत आहे. स्त्रियांना समुपदेशन करण्यासाठी, त्यांच्या समस्या, त्यांच्या मूक भावनांमधील त्यांनी सोसलेल्या यातना या सर्व समजून घेण्यासाठी समुपदेशकाजवळ विशेष प्राविण्य असायला हवेच.त्यासाठीचे मार्गदर्शनही या पुस्तकात उत्तम रीतीने केले आहे.
नग्न करून मारझोड करणाऱ्या नवऱ्याला संपवलेली विमला , पिटा कायद्याखाली अटक झालेली आणि आईने धंद्याला का लावलं असावं या प्रश्नाने ग्रासलेली सलोनी , बालपणी मेहुण्याने केलेल्या बलात्काराचं ओझं शरीर आणि मनावर म्हातारपणापर्यंत वागवणारी ‘ पी ‘… अशा अनेकजणी…..यांच्या कथा वाचून ‘यांचे स्त्रीत्व हाच त्यांचा गुन्हा का?’ असा जीवघेणा प्रश्न वाचकाला भेडसावत राहतो. ब्लॅक अँड व्हाइट फोटोमधून दिसणारे त्यांचे डोळे जणू प्रकाशातल्या अंधाराची सहन न होणारी जाणीव करून देतात.
सेज पब्लिकेशन द्वारा प्रकाशित झालेलं हे पुस्तक २८२ पानांचे असून त्याची मूळ किंमत ४२५ रु. आहे.
समाजापासून दूर असलेल्या, रुक्ष भावनांचेच ऋतू जिथे बारा महिने हैदोस घालत असतात अशा नरकयातना भोगणा-या अनेक मातांची ही कहाणी एकदातरी वाचावी अशीच आहे…..

No comments:

Post a Comment