Wednesday, August 8, 2012

तुझ्या ‘मनात’ कुणीतरी : मनातल्या मनातली मनस्वी कथा

या संपूर्ण मानवजातीच्या उत्क्रांतीतून विकसित झालेली निसर्गाची एक अद्भुत किमया म्हणजे माणसाचे ‘मन’. अच्युत गोडबोले लिखित ‘मनात’ या पुस्तकात याच मनाचा खोलवर जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न श्री. अच्युत यांनी केला आहे.
पृथ्वीच्या निर्मितीचा शोध लावण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावणारा माणूस अजूनही मनाच्या निर्मितीचा शोध लावू शकलेला नाही आणि तसा तो लागणारही नाही. अशा या बुद्धीच्या कक्षेत न सापडणा-या अदृश्य मनाची कहाणी या पुस्तकात वाचकांना कळणार आहे. माणसाच्या शरीर आणि मेंदूबरोबरच त्याच्या मनामध्येही अनेक बदल झाले, त्याच्या संकल्पना बदलल्या, निरनिराळे पैलू उलगडले अशा मनाचा इतिहास, त्यावर झालेले संशोधन, निष्कर्ष आणि त्याचे वेगवेगळे रूप आपल्याला पुस्तकात वाचता येईल. अतिशय सध्या, सोप्या भाषेतील तपशीलवार माहिती या पुस्तकात दिलेली आहे.
माणसाच्या मेंदूला ज्याचा थांग अजून लागलेला नाही असे हे अदृश्य मन आपल्या शरीराचा एक अवयवच आहे. अनादी आणि अनंत अशा मनाच्या संस्कृतीचा इतिहास वाचताना वाचकाच्या ‘मनामध्ये’ एक अवर्णनीय कुतूहल जागे होऊन त्यांना अचंबित करणारे ज्ञान या पुस्तकाच्या रूपाने मिळणार आहे. ज्याचे वर्णन वाचून आपलं ‘मन’ थक्क होतंय, आपण अवाक होतोय तेच मन आपल्याही शरीरात आहेच आणि सगळी त्याचीच लीला असल्यामुळे आपण हे अनुभव घेऊ शकतो हा अनुभव तर नक्कीच शब्दात मांडता येण्यासारखा नसेल….
निर्गुण- निराकार अशा अंतरात्म्याच्या अलीकडे अस्तित्वात असणारे ‘मन’ मात्र निराकार नसते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा षडरिपूंनी बद्ध झालेले हे मन माणसाच्या कळत नकळत त्याच्या आयुष्यातील घटनांना जबाबदार ठरत असते. क्षणार्धात बदलणा-या त्याच्या अवस्था म्हणजे आनंद, दु:ख, काळजी, राग, अभिमान, अहंकार, याच्या कचाट्यात सापडून माणूस मात्र पुरता थकून जात असतो. पण हे थकणे आपल्या मनाचे असून आपण मात्र निराकार राहून, स्थितप्रज्ञ राहून आयुष्य जगले पाहिजे हे समजणे फार गरजेचे असते.
‘एक वेळ आभाळाचा थांग लागेल पण माणसाच्या मनाचा नाही’ असं विधान आपण अनुभवत असतोच. पण याच अथांग मनाचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत असताना जे काही धागे दोरे महान तत्त्वज्ञांना सापडले त्याचा उल्लेख मनात या पुस्तकात आला आहे. श्रीकृष्ण, ख्रिस्त,बुद्ध, कालिदास असो किंवा मग शेक्सपियर, फ्रॉईड, टॉल्सटॉय असो यांच्या बरोबरीनेच अनेक मानसशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, तत्ववेत्ते अशा अनेक व्यक्ती आणि प्रवृत्ती या जगात होऊन गेल्या….या प्रत्येकाच्या अद्भुत व्यक्तिमत्वाचा गाभा हा त्यांच्या मनामध्येच झालेल्या उच्च विकसनातच दडला होता, या वास्तवाचा केवळ स्वीकार न करता त्याचा थोडा अभ्यास या पुस्तकाद्वारे आपल्याला करता येईल….
वाहणा-या वा-यासारखे चंचल असणारे हे मन सांभाळत आपण मात्र या वादळ वा-यात कसे स्थिर राहायचे याचे उत्तम मार्गदर्शन श्री. अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. ‘मनोविकास प्रकाशन’ तर्फे प्रकाशित होणारे हे पुस्तक ६२८ पानांचे असून पुस्तकाचे मूल्य रू. ३७५ आहे.प्रत्येकाच्याच अंतर्मनाला साद घालणारे आणि आपल्या जवळ असणा-या निसर्गाच्या एका आविष्काराचे साक्षी असणारे हे पुस्तक प्रत्येकाने मनापासून वाचायला हवेच.

No comments:

Post a Comment