‘तुकाराम’ या आपल्या आगामी मराठी चित्रपटाबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. चंद्रकांत कुलकर्णी आमच्याशी खूप मनमोकळेपणाने बोलले. ते म्हणाले, ” तुकाराम एकूणच चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता. कंटेंट वाईजही खूप मोठा होता. हा सिनेमा बायोपिक्स करायचा असल्यामुळे शिस्तीत काम करावं लागतं. पण माझे लेखक अजित दळवी आणि प्रशांत दळवी यांनी काम खूप सोपं केलं कारण हा विषय जेवढा अभ्यासावा तेवढा कमी आहे. हा सिनेमा बायोपिक्स करायचा असल्यामुळे संपूर्ण चरित्रपट निर्माण करता यावा आणि तो फिक्शन व्हावा, तो डॉक्युमेंटरी करायचा नाही या पद्धतीने त्याचं ट्रीटमेंट झाल्यामुळे खूप छान काम करता आलं आणि लिखाण खूप चांगलं झालं की मग आपोआप ते बाकीच्या टेकिंगला, त्या प्रोडक्शन व्हॅल्यूला कारणीभूत ठरतं. ४०० वर्षांपूर्वीचा काळ जसाच्या तसा रिक्रिएट करता यायला हवा होता. ते जास्त कॉम्प्लिकेटेड होतं. १६०९ -१६५० असं तुकारामांचं वय आहे. माझ्या सिनेमात १६१८ ते १६५० असा कालावधी आहे म्हणजेच या चित्रपटात ९/१० वर्षांचा तुकाराम दाखवला आहे. या स्क्रिप्ट मध्ये कम्प्लीट चार फेजेस मधला , चार स्टेट ऑफ माईंड आणि चार अवस्थांमधला तुकाराम दाखवला आहे. बालपण, तरुणपण, मधला आणि जो आपल्याला माहीत आहे तो तुकाराम या पद्धतीने ते सगळं झालं. प्रभातच्या सिनेमात संत झाल्यानंतरचा तुकाराम होता आणि माझ्याकडे बायोपिक्स असल्यामुळे मला अजून मागे जाऊन त्याची सगळी रचना स्क्रिप्टमध्ये होती तशी करावी लागली. राजन कोठारी ‘तुकाराम’चे सिनेमाटोग्राफर आहेत. संगीत दिग्दर्शक म्हणून अशोक पत्की आणि अवधूत गुप्ते यांना एकत्र आणलं कारण मला ते साउंड्स क्रिएट करताना काही जरा वेगळं पाहिजे होतं.
तुकारामांचे वडील सावकार होते, पूर्वी वाणी होते. त्यांचा व्यवसाय पण होता, अशा वेळेला माणूस संत कसा झाला, म्हणजे कशी कशी कारणमीमांसा झाली असेल, काय रिलेशनशिप असेल हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आपल्याला नंतरच्या गोष्टी माहीत असतात. पोटात जाऊन काहीच माहीत नसतं. हे काम नेहमीपेक्षा खूप लेंदी झालं म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला आपलं काहीतरी काम होतं. मी जवळपास सातारा सेंटर धरून १५० कि. मी.च्या परिसरात १४ ते १५ गावात शूटिंग केलं. कारण ४०० वर्षांपूर्वी म्हणणं सोपं आहे पण ४०० वर्षांपूर्वी म्हणजे विजेचा खांब नाही, वायर नाही, प्रदूषण नाही, प्लास्टिक नाही हे सगळं पाळायचं होतं. मी सलग ४५ दिवसांचं शूटिंग केलं. १५० जणांचं युनिट आहे. खूप मजा आली हे काम करताना. बजेट, काम, आवाका या पद्धतीने २ ते ३ सिनेमांचं काम एकत्र झालं.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत ४/५ महत्वाची नावं आहेत त्यातले एक तुकाराम महाराज. त्यांच्यामुळे इतर अनेक जण घडले तर ते स्वतः कसे घडले यासाठी त्या काळात जाण्याचा एक चांगला प्रयत्न केला. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांपेक्षा २० वर्षांनी लहान होते. या सिनेमात ते दोघं एकत्र पण आहेत. ते कसे आहेत, काय आहेत हे मी काही सांगत नाही. त्याची इंटरेस्टिंग पद्धतीने एक गुंफण आहे. क्लायमॅक्सच्या वेळेला तर एक हजार लोकांचा सहभाग होता. सिनेमा करताना खूप अभ्यास करता आला, मागे जाता आलं, भाषेचा अभ्यास करता आला. चांगली स्टारकास्ट मिळाली. खूप लोकांनी तुकाराम सिनेमाचं महत्त्व ओळखून सीनची लेन्थ न बघता कार्य केलं, आनंदाने आले. त्याच्यामुळे काम मोठं झालं. ते स्वतः मोठे होते म्हणून आम्ही मोठं काम करू शकलो. महिनाभराने सिनेमा रिलीज होईल. संदेश भंडारे ज्यांनी वारीवरचं एक पुस्तक छापलंय, त्यांना खास आम्ही स्पेशल फोटोग्राफीसाठी बोलावलं, तर त्यांनी त्या दरम्यान काढलेल्या काही फोटोंचं प्रदर्शन पुणे, मुंबईत करत आहोत. वारीवर एक परिसंवाद पण घेणार आहोत.”
तुकारामांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जितेंद्र जोशी बद्दल चंद्रकांतजी म्हणाले, “तुकाराम विठ्ठलाशी एकरूप झाले तसं त्याने दिग्दर्शकाशी एकरूप व्हायला हवं होतं आणि तो झालाही.”
‘तुकाराम’ चित्रपटाच्या ध्वनीफितीचं प्रकाशन काल ७ मे रोजी पी.वाय.सी. क्लब, पुणे येथे पार पडले. त्याप्रसंगी निर्माते संजय छाब्रिया, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अजित दळवी, अशोक पत्की, जितेंद्र जोशी व ज्ञानेश्वर मेश्राम उपस्थित होते.
No comments:
Post a Comment