Sunday, May 13, 2012

नाशिकमध्ये रंगला मराठी चित्रपट शतसांवत्सरिक सोहळा

2 2 1024x682 नाशिकमध्ये रंगला मराठी चित्रपट शतसांवत्सरिक सोहळा

‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’ ही देशातील सर्व फिल्म सोसायट्यांची अखिल भारतीय संघटना आहे. महाराष्ट्रातल्या २५ जिल्ह्यात एकूण ५० सोसायट्या कार्यरत आहेत. फेडरेशनचा ‘महाराष्ट्र चॅप्टर’ महाराष्ट्रात क्रियाशील असून त्यांच्यातर्फे नेहमीच निरनिराळे कार्यक्रम आखण्यात येतात. यंदा मराठी सिनेसृष्टीला १०० वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘महाराष्ट्र चॅप्टर’ तर्फे मराठी सिनेमाचा शतसांवत्सरिक सोहळा नाशिक येथील पांडव लेण्याजवळील दादासाहेब फाळके स्मारकात ६ मे ला साजरा करण्यात आला. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
मराठी सिनेमाच्या शंभराव्या वर्षातील पदार्पणाच्या या समारोहाची सुरुवात दीप प्रज्वलनाने न करता सुधीर मोघेंनी दादासाहेब फाळके यांच्यावर केलेल्या कविता सादरीकरणाने करण्यात आली. दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूकपट ३ मे १९१३ रोजी मुंबईच्या कॉरोनेशन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीचे जनक मानले जातात. भारतीय सिनेमाबरोबरच मराठी चित्रपटांचा जन्मही ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटामुळे झाला. १९१३ ते २०१३ हे मराठी चित्रपटाचे शतक महोत्सवी वर्ष असून शतकाचा आरंभ २०१२ पासून होत आहे. या निमित्तानेच मराठी सिनेसृष्टीचा हा शतसांवत्सरिक सोहळा नाशिक महापालिकेच्या सहाय्याने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात दादासाहेब फाळके यांच्या उपलब्ध मूकपटावरून पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काईव्हने बनवलेली ‘फाळके अॅन्थालॉजी’ ही ५ मि.फिल्म व १९७० साली फाळके जन्मशताब्दी समारोह समितीने बनवलेली फाळकेंचे कर्तृत्व रेखाटणारी गजानन जहागीरदार दिग्दर्शित ‘ड्रीम स्केस विंग्ज’ ही डॉक्युमेंटरी या वेळी दाखवण्यात आली.
नाशिकचे महापौर अॅडव्होकेट यतीन वाघ आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. गेल्या पन्नास वर्षात मराठी सिनेमाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून देणारे निर्माते- दिग्दर्शक आणि कलावंत यांचा सुलोचना दीदी आणि यतीन वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात दिग्दर्शक अमोल पालेकर, जब्बार पटेल, राजीव पाटील, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी, संदीप सावंत व निर्माते रामदास फुटाणे यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर मराठी सिनेमाला प्रेक्षक खेचून आणणारे दिग्दर्शक, निर्माते किरण शांताराम, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर, विजय कोंडके, महेश मांजरेकर, राजू फिरके आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचाही सत्कार करण्यात आला. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी उपस्थित नसल्याने सुधीर मोघे यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. तर जब्बार पटेल आणि महेश मांजरेकर यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांचा पुरस्कार घरी पाठवण्यात आला. या सोहळ्याचे सूत्र संचालन अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी केले.
या कार्यक्रमात मौज प्रकाशनने दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित ‘काळ, कर्म आणि कर्तृत्व’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ५०० पानांच्या या पुस्तकाचे मूल्य ८०० रुपये असून राज्यातील सर्व फिल्म सोसायट्यांना ते भेटवस्तू स्वरूपात देण्यात आले. याबरोबरच सिनेपत्रकार मंदार जोशी लिखित चित्रपट सृष्टीच्या १०० वर्षातील महत्वाच्या १०० सिनेमांचा आढावा घेणारं ‘शंभर नंबरी सोनं’ हे पुस्तक महापौर यतीन वाघ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी किरण शांताराम यांनी आर्थिक मदत केली आहे. सोहळ्याच्या अखेरीस किरण शांताराम यांनी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे (वैयक्तिक देणगी दिल्याबद्दल) आणि कार्यक्रमाशी जोडलेल्या सर्व कलावंतांचे आभार मानले. याप्रसंगी बोलताना किरण शांताराम यांनी सांगितले की सिनेसृष्टीच्या शंभरी निमित्त वेगवेगळ्या शहरात अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून २०१३ मध्ये हे वर्ष संपत येईल तेव्हा मुंबईमध्ये एका भव्य दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल.

No comments:

Post a Comment