परवा रात्री(ता. १३) ‘सत्यमेव जयते’चा अजून एक हृदयद्रावक भाग प्रसारित झाला. विषय होता ‘लहान मुलांचं होणारं लैंगिक शोषण’. विषयच भयानक आहे. प्रत्यक्ष शोषित अशा काही जणांनी आपले अनुभव परवा सगळ्यांसमोर सांगितले. अगदी दोन वर्षांचा लहान मुलगाही लैंगिक शोषणाचा बळी पडतो हे ऐकून थरकाप होतो, संताप येतो. अनुभव सांगणाऱ्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की शोषण करणारी व्यक्ती शोषिताच्या घरच्यांच्या, पालकांच्या अगदी जवळची व्यक्ती असते. त्याच्यावर शोषिताच्या पालकांचा प्रचंड विश्वास असतो. याचा शोषण करणाऱ्या व्यक्तीला फायदा होतो आणि शोषिताला तोटा. मुलं आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगायला लाजतात, घाबरतात. त्यांना हा विषय पालकांशी कसा बोलायचा असा प्रश्न पडतो. आई, वडील आपल्यावर विश्वास ठेवतील का? का आपल्यालाच दोषी मानतील, या आणि अशा अनेक शंकांनी बिचारे गप्प राहतात. त्यामुळे त्यांचा कोंडमारा व्हायला लागतो, त्यांना जगणं असह्य व्हायला लागतं. त्यांचं लहानपण हिरावून घेतलं जातं. कधी कधी ते स्वतःचीच घृणा करायला लागतात. काही जणांनी तर दहा दहा वर्षं लैंगिक शोषण झाल्यावर असह्य होऊन किंवा मानसिक बळ येऊन घरातल्या मोठ्या माणसांना सांगण्याचं धाडस केलं. त्यांच्यातल्याच एका आईने प्रेक्षकांना आवाहन केलं की मी केलेली चूक तुम्ही करू नका. आपल्या मुलाने/मुलीने नुसत्या खुणेनी जरी अशा गोष्टी सूचित केल्या तरी त्याच्यावर/तिच्यावर विश्वास ठेवा, परक्या लोकांवर नाही. काहीही झालं तरी आपल्या पाल्याला आधार द्या, त्याच्या बाजूने उभे राहा.
या बाबतीत डॉ. मित्रा म्हणाले की अशा लोकांना आपल्या कृत्याबद्दल काहीही गिल्ट नसतो. मुलांना ते अॅडल्टच समजतात. असे लोक मानतात की मुलंही ही गोष्टं एन्जॉय करतात. ते मुलांचा अभ्यास करतात, त्यांच्या हालचाली बघतात. असे कृत्य करणारा माणूस कोणीही असू शकतो. चेहऱ्यावरून आपण त्याला ओळखू शकत नाही. असा माणूस लहान मुलांमध्ये पटकन आणि जास्त वेळ मिसळतो. त्यांच्याबरोबरच जास्त वेळ घालवतो. ते पुढे म्हणाले की एकदा त्यांच्या एका स्टुडंटने विचारले की मोठ्या माणसांचा आदर करावा का? तेव्हा त्यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यांचे प्रिन्सिपल म्हणले की हे काय शिकवता? तर डॉ.मित्रा म्हणाले की मोठ्या माणसांच्या बिहेविअर बद्दल आदर दाखवा.
नंतर निशित कुमार यांनी सांगितले की लहान मुलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल कोणताही खास कायदा नाही. ते स्वतः दहा वर्षं कोर्टात लढले आणि त्यांनी अशा मुलांना न्याय मिळवून दिला. त्यानंतर आमीर खानने लहान मुलांबरोबर एक वर्कशॉप केले की ज्यामुळे मुलं याबाबतीत सावध होतील, स्वतःला ते वाचवू शकतील. मुलं सावध झाली तरी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मात्र मोठ्या माणसांची आहे. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध ठोस कायदा हवाच यासाठी आमीर तर्फे सर्वांच्या सह्या असलेले पत्रक सरकारला सादर केले जाणार आहे ज्यावर पहिली सही अभिनेत्री श्रीदेवीने केली.
असा कार्यक्रम करणाऱ्या आमीर खानला सुपर ब्रेन म्हणून रिस्पेक्ट केलं पाहिजे कारण IPL चालू असताना सुद्धा आमीर IPL व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणतोय. IPL सुरु असताना मिडिया जवळजवळ सुट्टीवर जातं. राजकारणीही या काळात काही न करता गप्प राहतात. सगळा देशच IPL मध्ये गुंततो. IPL हा माईंड स्पेस ऑक्युपाय करणारा इव्हेंट आहे किंवा होता. IPL सुरु झाल्यावर खूप कमी कार्यक्रम लाँच झाले किंवा झालेच नाहीत म्हणलं तरी चालेल. फक्त ‘सत्यमेव जयते’ लाँच झाला आणि तोही रविवार या ‘प्राईम डे’ ला. ज्यांना क्रिकेट मधलं काहीही कळत नाही आणि ज्यांची खरं तर काहीच गरज नाही अशा चीअर गर्ल्सना बघण्यापेक्षा प्रेक्षक ‘सत्यमेव जयते’ बघणं पसंत करत आहेत. अश्लील नृत्य, कर्कश्श गाणी यांचा नुसता धुमाकूळ असणारे कार्यक्रम बघण्यापेक्षा प्रेक्षकांना ‘सत्यमेव जयते’ सारखा हृदयस्पर्शी कार्यक्रम बघावासा वाटतोय. या कार्यक्रमाने टीआरपीचे सारे विक्रम मोडून टाकले. या कार्यक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आमीरसारख्या संवेदनशील माणसाला सलाम !!!
No comments:
Post a Comment