‘जय जय महाराष्ट्र माझा’ या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत प्रसिद्ध ‘व्हिजे’ अनुषा दांडेकर असून तिच्यासोबत महेश मांजरेकर,मृणाल कुलकर्णी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. परदेशात वाढलेल्या एका मराठी मुलीचा महाराष्ट्रात परत आल्यानंतरचा भावनिक प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. हा चित्रपट महाराष्ट्राची महती तर सांगतोच पण त्याचबरोबर या मातीने जपलेल्या मानवी नात्यांची, भावभावनांची हृदयस्पर्शी कथाही सांगतो.
सरधोपट विनोदी चित्रपट आणि सासू-सूनांच्या मेलोड्रामांमध्ये अडकलेल्या मराठी चित्रपटात आता विविध विषय हाताळले जात आहेत. नव्या पिढीचा, प्रेक्षकांच्या बदललेल्या अभिरुचीचा विचार करून चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांच्या वेगळ्या प्रयत्नांमुळे हे बदल ठळकपणे समोर आले आहेत. गौतम जोगळेकर हे त्यातील एक नाव. पदार्पणातच ‘पक पक पकाक’ सारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट देऊन सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात गौतम जोगळेकर यशस्वी ठरले. दिग्दर्शनाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी गौतमने अभिनयाची वाटही धुंडाळली होती. नाना पाटेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘प्रहार’ या हिंदी चित्रपटात गौतमने साकारलेला मिल्ट्रीमन अनेकांच्या लक्षात राहिला. पण अभिनयापेक्षा दिग्दर्शनात रस असणाऱ्या गौतमने आपले लक्ष याच क्षेत्रावर केंद्रीत केले. नानाच्या तालमीत तयार झालेल्या गौतमने आपल्या पहिल्या चित्रपटात मुख्य नायक म्हणून नानाचीच निवड केली. ‘पक पक पकाक’ यशस्वी झाला आणि गौतमबद्दल अपेक्षा निर्माण झाल्या.
आता ‘जय जय महाराष्ट्र माझा’ मधूनही गौतमने एक अतिशय वेगळा विषय मांडला आहे. त्यामुळे वेगळ्या विषयाच्या चित्रपटाची वाट बघणाऱ्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ही चांगली ट्रीट ठरू शकते.
No comments:
Post a Comment