रितेशने नुकतेच जाहीर केले होते की तो मराठी चित्रपट निर्मिती करू इच्छितो, परंतु, याबाबतीत अक्षयने बाजी मारली आहे. अक्षयचा पहिला मराठी चित्रपट ‘७२ मेल’ पूर्ण झाला आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार नटरंगचे दिग्दर्शक रवी जाधव आणि रितेश यांच्यात मराठी चित्रपट निर्मितीबद्दल चर्चा चालू आहे. रितेशच्या म्हणण्यानुसार त्याच्या मराठी चित्रपट निर्मितीला ऑगस्ट नंतर सुरुवात होईल.
खिलाडी अक्षय कुमार याबाबतीत रितेशच्या एक पाऊल पुढेच आहे. ‘७२ मेल’ हा चित्रपट अशोक व्हटकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे. २००९ साली राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेला ‘जोगवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव पाटील हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘७२ मेल’ हा चित्रपट १९६० साली सातारा ते कोल्हापूर चालणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलाच्या प्रवासावर बेतलेला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षयच्या मराठी चित्रपट निर्मिती संस्थेने या चित्रपटाबाबत जाणूनबुजून गुप्तता पाळली. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “अक्षय बऱ्याच दिवसांपासून मराठी चित्रपट निर्मितीसाठी उत्सुक होता. आम्हा दोघांमधील एका समान दुव्यामार्फत याबाबतची मिटींग झाली. मी अक्षयला सांगितलेली संकल्पना त्याला आवडली आणि तो लगेचच चित्रपट निर्मितीला तयार झाला. त्याने दोनच दिवसांपूर्वी चित्रीकरण पूर्ण केले आहे आणि आता तो पुढील निर्मिती प्रक्रिया सुरु करत आहे.”
अक्षयला आम्ही या चित्रपटात पाहू शकू का? या प्रश्नावर पाटील हसून म्हणाले की अक्षय या चित्रपटाचा फक्त निर्माता म्हणून भूमिका बजावत आहे. चित्रपटाबाबत अजून माहिती देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली व ते म्हणाले की चित्रपटातील कलाकार आणि इतर माहिती जाहीर करू नये अशी आम्हाला या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेने विनंती केली आहे.
‘७२ मेल’ प्रदर्शित होण्याची तारीख अजून निश्चित झालेली नाहीये. मराठी चित्रपट सृष्टीतही अक्षयचे जोरदार स्वागत होईल हे मात्र नक्की!
No comments:
Post a Comment