येत्या शुक्रवारी म्हणजेच १६ डिसेंबरला वेगवेगळ्या विषयावर आधारीत दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पुरुषोत्तम अग्रवाल यांची निर्मिती असलेला आणि भरत जाधव व भार्गवी चिरमुले यांची प्रमुख भूमिका असलेला 'वन रुम किचन'. या चित्रपटाचे दिग्दर्शन- कथा- पटकथा आणि गीते महेश टिळेकर यांची असून संगीत अशोक पत्की यांच आहे. 'वन रुम किचन' ही एक साधी सरळ चाळीतील मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी असून ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी या चित्रपटात कॅथलिक आईची भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात प्रमुख भूमिकेत भरत जाधव, भार्गवी चिरमुले, राजेश शृंगारपुरे, किशोरी गोडबोले असून सोबत विजू खोटे, आशालता, विजय चव्हाण, किशोरी अंबिये, विजय चव्हाण, संजय मोहिते, स्मिता शेवाळे, राकेश बेदी, किशोर प्रधान, लिलाधर कांबळी, संदीप पाठक यांच्या भूमिका आहेत.तसेच अश्वमेघ प्रॉडक्शन्स निर्मित विजू माने दिग्दर्शित 'शर्यत' हा चित्रपट. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत एदलाबादकर आणि विजू माने यांचे असून हेमंत एदलाबादकर आणि विजू माने यांच्या सोबत नंदकिशोर चौघुले यांनी संवादलेखन केले आहे. विजू माने आणि अशोक बागवे यांनी लिहीलेल्या गीतांना चिनार महेश यांच संगीत आहे. सचिन पिळगावकर एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार असून त्यांच्या सोबतच संतोष जुवेकर आणि विद्याधर जोशी सुद्धा 'शर्यत' मध्ये आहेत.
अण्णा भाऊ साठेंच्या कार्याने प्रेरीत होऊन प्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक - लेखक पप्पू लाड यांनी अण्णांच्या कार्याची महती सांगणार्या अण्णा लयभारी या चित्रपटाची निर्मिती केली असून त्यांचा हा चित्रपट येत्या १६ डिसेंबर, अण्णांचीच कर्मभूमि असलेल्या चेंबूर येथील अमर चित्रपटगृहात प्रदर्शित होत. १६ डिसेंबरला दुपारच्या मॅटिनीला (१२.३० वा) भव्य प्रिमिअर शो होणार आहे.अण्णा भाऊ साठे याचं साहित्य हा जसा संशोधनाचा विषय आहे. तसंच त्यांच व्यक्तिमत्त्व आणि समग्र जीवनपट सुद्धा ! साहित्य, लोककला, कामगार स्वातंत्र लढा, सर्वसामान्य गरीब माणसावरील अन्यायविरोधात आपलं अवघं आयुष्य ज्या माणसाने पणाला लावलं त्यांच्यावर इतक्या वर्षानंतर मराठीमध्ये चित्रपट येऊ लागलाय, ही खरं म्हणजे अभिनासास्पद आणि तितकीच समाधान देऊन जाणारी बाब आहे.
'वळू' आणि 'विहीर' अशा दोन चित्रपटांच्या यशानंतर आणि लवकरच प्रदर्शित होणार्या बहुचर्चित देऊळचे दिग्दर्शक उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांच्या 'आरभाट' संस्थेची निर्मिती व प्रवीण मसालेवाले यांची प्रस्तुती असलेल्या 'मसाला' या चित्रपटाचे दिग्दर्शन संदेश कुलकर्णी करणार आहे. या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून उमेश कुलकर्णी काम पाहणार असून कथा, पटकथा आणि संवदलेखन गिरीश कुलकर्णी यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते एच. एम. रामचंद्र या चित्रपटाचे छ्यांकन करणार असून संकलन अभिजीत देशपांडे करणार आहेत. चित्रपटाची गीते सुनील सुकथनकर यांनी लिहीली असून आनंद मोडक यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी मध्यवर्ती भूमिकेत असून अमृता सुभाष, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, हृषिकेश जोशी, श्रीकांत यादव, प्रवीण तरडे, नेहा शितोळे, शशांक शेंडे हे कलाकार आहेत.
कौटुंबिक मराठी चित्रपट थ्रीडीमध्ये. ऐकायला वेगळ वाटतं नां? पण हे खरं आहे. मराठी चित्रपटांमध्ये देखील उत्तम, दर्जेदार चित्रपट येत आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मराठी चित्रपटात सुधारणा होत असून मराठीतला पहिला थ्रीडी कौटुंबिक चित्रपट 'आई मला मारु नकोस' पूर्ण झाला आहे. नुकतचं या चित्रपटाच्या ऑडिओ सिडीचे प्रकाशन सिनेअभिनेत्री जयश्री टी यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे सभागृह, प्रभादेवी येथे संपन्न झाले. यावेळी चित्रपटाचे निर्माते व अभिनेते अविनाश जाधव, दिग्दर्शक सत्यप्रकाश मंगतानी, विजू खोटे, मृणालिनी जांभळे, मनोज आनंद, कॅमेरामन राजन लायलपूरी, नृत्यदिग्दर्शक पप्पू खन्ना, जयंत येलूलकर आदि उद्योग, राजकिय व चित्रपटक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सार्थक प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माते अविनाश जाधव व दिग्दर्शक सत्यप्रकाश मंगतानी यांनी प्रथमच हा थ्रीडी पट दिग्दर्शित केला आहे. याची कथा राजेंद्र बोडारे यांची असुन पटकथा संवाद सत्यप्रकाश मंगतानी यांनी लिहीले आहेत.
'श्री चिंतामणी चित्र' निर्मिती संस्थेच्या या चित्रपटात 'दारुबंदी' सारखा खेड्यापाडयातील आजचा ज्वलंत सामाजिक प्रश्न मार्मिक पद्धतीने रेखाटण्यात आलेला 'सगळं करुन भागले' येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे मध्यवर्ती भूमिकेत आहे.'सगळ करुन भागले' ची खुसखुशीत कथा-पटकथा आणि संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे सोबत चेतन दळवी, श्वेता मेहेंदळे, माधवी निमकर, भारत गणेशपुरे, जयराज नायर, अविनाश खर्शीकर, जयवंत भालेकर, गणेश रेवडेकर, आधा घोडके, सुनील होलकर, गिरीश जोशी, राधिका बोरगावकर आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
शाहीर दादा कोंडके यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी खुप गाजविली. त्यांची स्मृती ताजी ठेवण्यासाठी दादांचे पुण्यातील एक निस्सीम चाहते विठ्ठलराव चव्हाण यांनी 'मला एक चानस हवा' या चित्रपटाची निर्मिती केली असून त्याचा मुहूर्त नुकताच पुण्यात हॉटेल संकेत इन' मध्ये पार पडला.याप्रसंगी या चित्रपटातील कलाकार विजय पाटकर, चेतन दळवी, मधु कांबीकर, हेमलता बाणे, किशोर नांदलस्कर आदि उपस्थित होते. या चित्रपटात मकरंद अनासपुरे व दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत आहेत. दादा कोंडके यांचे अतिशय निकटचे सहकारी बाळ मोहिते यांनी या चित्रपटाची कथा- पटकथा व संवाद लिहिले असून चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. त्यामुळे या चित्रपटात दादा कोंडके स्टाईल सहा गाणी असून ती संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात सुरु झाले आहे.
हल्ली समाजात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. इतके दिवस सासरी मुलीचा छळ होतो अशा तक्रारी ऐकू येत होत्या परंतु आता मुलीकडूनही सासरच्या व्यक्तींचा छळ होतो अशी उदाहरणे घडत आहेत. पुण्यात काही दिवसांपुर्वी एका तामिळी कुटुंबातील आई- वडिल व दोन भावांनी पत्नीकडून येणार्या सतत धमक्या व छळाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केली होती. याच घटनेवर आधारित 'धागेदोरे' या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे निर्माते पंकज छल्लानी व अभिजित आपटे असून दिग्दर्शक 'आरंभ' फेम अक्षय दत्त यांनी केले आहे. या चित्रपटात उमेश कामत, सई ताम्हणकर, भार्गवी चिर्मुले, विनय आपटे, संजय मोने, मानसी मागीकर आदींच्या भूमिका आहेत. गीतकार संदीप खरे यांच्या गीतांना संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. पुण्यातील पौंड रस्त्यावरील अजंठा ऍव्हेन्यु सोसायटीत नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले.