Thursday, July 28, 2011

मुक्तायन निर्मित 'वाळू दोन नग' नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ जुलैला.

'मुक्तायन' या नाटयसंस्थेच्या प्रारंभासाठी 'वाळू दोन नग'  या प्रयोगाची निर्मिती मुक्तायनने केली आहे. या नाटकाचे लेखन अमेय सावडकरने केले आहे तर दिग्दर्शन नचिकेत ढवळीकरने केले आहे. कथेचा विस्तार नचिकेत ढवळीकर आणि पियुष कुलकर्णीने केला आहे. तसेच नेपथ्यकला हितेश लुणावत आणि अपुर्व कुलकर्णीची आहे. बॅगराउंड स्कोर सागर लाड आणि रंगभुषा गौरी निकमची आहे. अनय घोले, शशांक दिवाण, नचिकेत ढवळीकर, साईप्रसाद निंबाळकर, पियुष कुलकर्णी, ह्र्षीकेश जोशी ह्या कलाकारांचा या नाटकात सहभाग आहे. 

'मुक्तायन'  या नाटयसंस्था स्थापनेच्या निमित्ताने ही संस्था आपल्यासाठी घेऊन येत आहे 'वाळू दोन नग'  या नाटकाचा प्रारंभाचा प्रयोग. भरतनाटय मंदीर येथे शुक्रवारी २९ जुलै २०११ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत या नाटकाचा प्रयोग आणि 'मुक्तायन' या नाटयसंस्थेचा शुभारंभ केला जाणार आहे.

Tuesday, July 26, 2011

'एकाच या जन्मी जणू' १ ऑगस्टपासून.

कडवा स्वाभिमान, जबरदस्त मनोधैर्य, बुलंद, आत्मविश्वास आणि दुर्दम्य आशावादाची ही कथा 'एकाच या जन्मी जणू' झी मराठीवर १ ऑगस्टपासून दर सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता दाखल होतेय.

ही कथा आहे अंजलीची. दिसायला अत्यंत सुंदर, तितकीच हुशार, मनमिळाऊ, सर्वांवर प्रेम करणारी आणि कुणाच्याही मदतीला कधीही धावून जाणारी. देवानं तिला सगळं काही दिलयं.. पण या सगळ्याबरोबरच आणखीही एक गोष्ट ईश्वरानं तिच्या पदरी टाकलीय, ती महणजे अपंगत्व.

'टेल अ टेल मिडीया'ची निर्मिती असलेल्या या मालिकेचे निर्माते आहेत, महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता. तर या मालिकेचे दिग्दर्शन केलेय मंगेश कंठाळे यांनी. आश्विनी शेंडे हिने  लिहिलेल्या शिर्षक गीताला निलेश मोहरीर यांच संगीत असून ते वैशाली सामंत हिने गायले आहे. तेजस्विनीपंडित अंजलीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत असून मानसी साळवी, मानसी कुलकर्णी, पियुष रानडे, मेगह्ना वैद्य, उदय सबनीस. सुलभा देशपांडे, जयंत घाटे, हेमांगी राव, सुप्रिया पाठारे, वर्षा दांदळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Tuesday, July 12, 2011

'उदय' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण.

गोव्याची पार्श्वभूमी असलेल्या आणि अस्सल कोकणी माणसाच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणार्‍या 'कलाक्षेत्र बॅनर'ची निर्मिती असलेल्या 'उदय' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच गोव्यात पूर्ण झाले.

निर्माते प्रविणकुमार पासी यांची ही पहिलीच मराठी निर्मिती आहे. कथा-पटकथा आणि दिग्दर्शन जितेंद्र शिकेरकर यांचे असून संवाद युवराज पाटील यांचे आहेत. या चित्रपटाद्वारे राम यशवर्धन हा नवोदित चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. राम यशवर्धनसह या चित्रपटात अविनाश नारकर, संपदा जोगळेकर- कुलकर्णी, तेजश्री प्रधान, शरद पोंक्षे, किशोर नांदलस्कर, आनंदा कारेकर, अरुण कदम, अनिरुद्ध हरीप, संजय मोहिते यांच्या प्रमुख भूमिका असून  विनय आपटे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Monday, July 11, 2011

आदेश बांदेकर 'पालवी' संस्थेत.

पंढरपूरला दरवर्षी वारी संपल्यानंतर असंख्य लहान बालके अनाथ होतात. आजारी, अपंग किंवा मुलंच्या संगोपनाचा भार उचलू न शकणारे आईबाप विठुमाऊलीच्या भरवशावर या मुलांना सोडून देतात. या मुलांची जबाबदारी मायेने उचलणार्‍या 'पालवी' या सेवाभावी संस्थेत आदेश बांदेकर गेले. असंख्य अनाथ आणि एड्सग्रस्त मुलांची माय झालेल्या मंगलताई शहा यांच्या या संस्थेत 'होम मिनिस्टर' चे खेळ खेळून महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजीने या बालदोस्तांच्या सहवासातून, त्यांच्या माध्यमातून विठूमाऊलीची ऊरीऊरी भेट घेतली. 

एकावर्षी 'होम मिनिस्टर' च्या भागात रखुमाईला पैठणी नेसवली होती. अगदी तसाच आनंद आज या 'पालवी'च्या शीतल वहिनींना पैठणी मिळाली म्हणून झाल्याच आदेश बांडेकर यांनी सांगितलं. येत्या आठवड्यात पंढरीची ही वारी 'होम मिनिस्टर' मधून अनुभवता येणार आहे, सोमवार ते शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता!

Saturday, July 9, 2011

'पाव्हणं जरा जपून' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

'श्री वरदविनायक' निर्मिती संस्थेच्या 'पाव्हणं जरा जपून' या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या हस्ते कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत संपन्न  झाला. तमाशाच्या फडावर आपल्या अदांनी घायाळ करणार्‍या लावण्यवतींचं वास्तव जीवन खडतर असतं. एका लावणीसम्राज्ञीच्या मुलीच्या जीवनातील संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर येत आहे. 

प्रतिक यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक कदम करणार आहेत. या चित्रपटाची कथा प्रतिक यांची असून पटकथा- संवाद शिरीष लाटकर यांनी लिहीले आहेत. शरद पोंक्षे, स्वप्नील राजशेखर, अश्विनी एकबोटे, डॉ. विलास उजवणे, डॉ. संजीव पाटील, सुदेश म्हशीलकर यांच्यासह नवोदित अभिनेत्री रुपाली गायकवाड, योगिता गिलेटकर, पूजा कासेकर या चित्रपटातून पदार्पण करीत आहेत.

Friday, July 8, 2011

'धुंद क्षण' - बेला शेंडेचा नवा अल्बम लवकरच.

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे यांचा 'धुंद क्षण' हा नवा अल्बम लवकरच येत आहे. हरिभाऊ विश्वनाथ कंपनी प्रस्तुत या अल्बमचे मार्केटिंग युनिव्हर्सल म्युझिक इंडीया लि. ही कंपनी करत आहे.

या नविन अल्बममध्ये 'रंगी तुझ्या अशी रंगले', 'झिम्माड सर निघाली', 'राधा दिवाणी रे हे गीत', 'खुलते मी अशी आठवता कुणी', 'मी एकटीच असते', 'अल्लड या लाटांनी', 'ओल्या ओल्या या देहावर', ' देही श्रावण सरतो गं' अशी इंडियन, वेस्टर्न, गजल अशा वेगवेगळ्या मुडची ८ गाणी असून सुरेश भट, मिलिंद जोशी, चंद्रशेखर सानेकर, श्रीरंग गोडबोले, आश्विनी शेंडे यांनी लिहीलेल्या गीतांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्यासह मिथिलेश पाटणकर, नीलेश मोहरीर आणि अविनाश- विश्वजीत अशा उत्कृष्ट संगीतकारांनी संगीत दिले आहे.